बॅण्डस्मन पदासाठी अर्ज भरलेल्या पाच हजार पैकी साडेतीन हजार उमेदवारांची दांडी

रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलातील ३ बॅण्डस्मन पदासाठी काल लेखी परीक्षा झाली. त्यासाठी ५ हजार ००५ उमेदवारी अर्ज आले होते. मात्र या परीक्षेला तब्बल ३ हजार २९७ उमेदवारांनी दांडी मारली. अवघ्या १ हजार ७०८उमेदवारांनी परीक्षा दिली.  स्थानिक अनेक प्रश्नांचा यामध्ये समावेश होता.  

रत्नागिरीतील १७ केंद्रांवर ही परीक्षा काल झाली. परीक्षेदरम्यान कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) शिवाजी पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे आणि अन्य पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी परीक्षा पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.

शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून सर्व केंद्रांवर पोलिस अधिकारी व अंमलदार, व्हिडिओग्राफर तैनात करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी ८ वाजल्यापासून प्रवेश पत्राची तपासणी करून वर्गात सोडण्यात येतहोते. अवघ्या ३ बॅन्ड्समन जागांसाठी ५ हजार ००५ उमेदवारी अर्ज आले होते. त्यामुळे मोठी बैठक व्यवस्था केली होती. परंतु अपेक्षेप्रमाणे त्याला कमी प्रतिसाद मिळाला ३ हजार २९७ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. १ हजार ७०८ उमेदवारांनी परीक्षा दिली. प्रश्नपत्रीके प्रमाणे जिल्ह्यातील अनेक प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. जिल्ह्यात किती पोलिस ठाणी,जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आदी प्रश्नांचा यामध्ये समावेश होता.