गतिमान कारभारासाठी जि. प. अध्यक्ष जिल्हा दौर्‍यावर

12 जुलैपासून दौरा; तिसर्‍या लाटेच्या तयारीचा घेणार आढावा

रत्नागिरी:- कोरोनामुळे जिल्हा परिषेदमार्फत राबविण्यात येणार्‍या कामांना गती देण्यासाठी अध्यक्ष विक्रांत जाधव 12 ते 20 जुलै या कालावधीत जिल्हा दौरा करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर तालुकास्तरावर आरोग्य यंत्रणेची तयारी, झिरो पेंडन्सी, जलजीवन मिशन आणि मनरेगाचा आराखडा यांचा आढावा घेण्यात येणार आहे.

गेली दिड वर्षे कोरोनामुळे सर्वच विकास कामे थांबलेली आहेत. अजुनही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र थांबलेल्या कामांना चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पावले उचलली जात आहे. जि. प. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर विक्रांत जाधव यांनी सुरुवातीलाच प्रशासनावर पकड निर्माण केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांचेही त्यांना चांगले सहकार्य मिळत आहे. सर्वसाधारण सभेसह अन्य विषय समिती सभाही वेळेत सुरु होत असून मुद्द्यांवर चर्चा घडत आहेत. आता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन तालुकानिहाय आढावा घेण्याचा निर्णय श्री. जाधव यांनी घेतला आहे. त्यानुसार 12 जुलैला रत्नागिरी पंचायत समितीमधून दौर्‍याला सुरवात होणार आहे. 13 जुलैला राजापूर, लांजा पंचायत समिती, 14 जुलैला संगमेश्‍वर, चिपळूण, 19 जुलैला गुहागर, दापोली, 20 जुलैला मंडणगड, खेड तालुक्यात आढावा बैठक होणार आहे. या दौर्‍यामध्ये सर्व खात्यांचे प्रमुखही सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रलंबित कामांची कारणे लक्षात घेऊन ऑन दी स्पॉट निर्णय घेतले जाणार आहेत. या दौर्‍यात ग्रामविकास विभागाच्या झिरो पेंडन्सी आणि नियमित कामांचा निपटारा याचा आढावा घेतला जाईल. तसेच मनरेगाच्या आराखड्यांचे प्रेझेंटेशन, जलजीवन मिशन योजनेतील कामांच्या अंदाजपत्रकाची स्थिती, कोरोनातील दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि तिसर्‍या लाटेची सज्जता याचा आढावाही ते घेणार आहेत. पंचायत समितीस्तरावर प्रलंबित राहीलेले विषयांचाही निपटारा ते करणार आहेत. या प्रकारे नियोजनबध्द दौरा करणारे विक्रांत जाधव गेल्या काही वर्षातील पहिलेच अध्यक्ष असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु होती.