रत्नागिरी:- काेल्हापूर येथून उपचार करून परतत असताना रुग्णवाहिकेला कंटेनरने धडक देऊन झालेल्या अपघातात संगमेश्वरजवळच्या कोंडअसुर्डे येथील दीर आणि भावजयचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ५.३० पन्हाळा-वाघबीळ येथे घडली. यशवंत दिनकर चव्हाण (वय ५८) आणि रश्मी राजेंद्र चव्हाण (४८) असे मृत्यू झालेल्या दाेघांची नावे असून, वैशाली श्रीकांत चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत.
यशवंत दिनकर चव्हाण ऊर्फ बावा चव्हाण हे आठवडाभर आजारी होते. त्यांच्यावर डेरवण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा आजार वाढत गेल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. कोल्हापूर येथे उपचार झाल्यानंतर त्यांना परत संगमेश्वर येथे आणण्याचे ठरले.खासगी रुग्णवाहिकेने त्यांना संगमेश्वर येथे आणण्यात येत होते. रुग्णवाहिकेने परतत असताना पन्हाळा वाघबीळ येथील वळणावर बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान आले असता त्यांच्या रुग्णवाहिकेला कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात यशवंत चव्हाण यांचा आणि रश्मी राजेंद्र चव्हाण यांचा मृत्यू झाला.