रत्नागिरी:- रत्नागिरीतील भरदिवसा झालेल्या अनंत भिसे यांच्या खून प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रदीप भिसे या आरोपीविरुद्ध केलेले अपील फेटाळले असून त्यांच्या निर्दोष ठरवलेल्या निकालावर शिक्कामोर्तब केले आहे. आरोपी प्रदीप भिसे यांच्यावतीने वकील राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर काम पाहिले.
रत्नागिरीतील अनंत भिसे यांची दिनांक 15 डिसेंबर 1999 रोजी दुपारी बाराच्या दरम्याने त्यांच्या नातेवाईकांसहित राहत्या घरातील अंगणामध्ये गप्पा मारत बसले असता संशयित आरोपी प्रदीप भिसे यांनी त्यांच्यावरती वैयक्तिक वादातून चाकूने वार केले असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या खुनासाठी प्रदीप भिसे यांना जबाबदार धरुन आरोपी करण्यात आले होते. नातेवाईकांनी अनंत भिसे यांना जखमी अवस्थेतत सिविल हॉस्पिटल रत्नागिरी येथे ऍडमिट केले होते आणि त्यांचा मृत्युपूर्व जबाब तेथेच नोंदवण्यात आला होता त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 302 अन्वये प्रदीप भिसे यांच्यावर ती खटला चालवण्यात आला होता. सर्व साक्षीदार तपासल्यानंतर रत्नागिरीतील जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रदीप भिसे यांना निर्दोष मुक्त केले होते.
सरकार पक्षातर्फे सन 2002 मध्ये प्रदीप भिसे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. आता त्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात असलेल्या तफावतीमुळे तसेच पुराव्याअभावी प्रदीप भिसे यांच्याविरोधातील अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळले. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती भिस्त यांच्या खंडपीठापुढे चालले व त्यात आरोपीतर्फे रत्नागिरीतील वकील राकेश भाटकर यांनी काम पाहिले.









