परराज्यातील बाजारपेठेसाठी कृषी पणन मंडळ घेणार आंबा महोत्सव

रत्नागिरी:- परराज्यात हापूस आंब्याकरिता बाजारपेठ स्थापन करण्यासाठी कृषी पणन मंडळातर्फे आंबा महोत्सव करण्यात येत आहे. त्यासाठी कोकणातील शेतकर्‍यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी आंबा उत्पादकांना केले आहे.

कोकणातील हापूस देशातील मोठ्या शहरांत शेतकर्‍यांमार्फत थेट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंडळाने नियोजन सुरू केले आहे. देशातील नवी दिल्ली, चंडीगड, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, पणजी, बंगळूर, चेन्नई, हैद्राबाद, इंदोर, भोपाळ या शहरामध्ये आंबा महोत्सवांचे आयोजन करून हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत मंत्री महोदयांनी सूचना दिल्या आहेत. आंबा महोत्सवांमुळे परराज्यातील बाजारपेठा आंबा उत्पादकांना उपलब्ध होण्यास मदत होईल. परराज्यांमधील आंबा महोत्सवात जे शेतकरी सहभागी होण्यास इच्छुक असतील त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, 7/12 उतारा (मागील 6 महिन्यातील), ओळखपत्र (आधार कार्ड झेरॉक्स) कृषी पणन मंडळास सादर करावयाचे आहे. अर्जासोबत स्टॉलवर उपस्थित राहणार्‍या कुटुंबातील व्यक्ती व सहकारी यांचे ओळखपत्रासह शिफारसपत्र शेतकर्‍यांनी देणे आवश्यक आहे. सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांनी अर्जासोबत भौगोलिक मानांकनाच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.