भगवती किल्यावरुन पडलेल्या तरुणीने केली होती इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट ?
रत्नागिरी:- शहरातील भगवती किल्ल्यावरून खोल दरीत पडलेल्या दीक्षा इंगवले या तरुणीच्या मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान तिची मृत्यू आधीची सोशल मीडियावरील पोस्ट समोर आली आहे. यात तिने आई, वडिलांवर प्रेम करणं कधीच थांबवणार नसल्याचं म्हटलं आहे.
दिनांक १ मार्च रोजी दिक्षाचा मृतदेह भगवती किल्याखालील खडकात सापडला होता. यानंतर हि आत्महत्या कि हत्या असे प्रश्न पुढे आले होते. दिक्षाचा मोबाईल देखील आजवर सापडला नसल्याने गूढ वाढत चालले आहे. दीक्षा या ठिकाणी कशी पोहचली? तिच्यासोबत अन्य कुणी होते काय? असे प्रश्न समोर आले होते. मात्र आता दीक्षाच्या मित्रवर्गातून दिक्षाची एक इंस्टाग्राम पोस्ट पुढे आली आहे, जी तिने आपल्या मृत्यूआधी पोस्ट केली आहे असे बोलले जात आहे. या पोस्टमध्ये दिक्षाने आपला फोटो शेअर केला असून त्याखाली एक मेसेज लिहिला आहे. त्यामध्ये तिने असे म्हटलंय कि मी माझ्या आई वडिलांवर प्रेम करणं कधीच थांबवणार नाही, जरी मला शिवीगाळ केली, वाईट शब्द व वाईट वागणूक दिली तरीही, पण अशी एक वेळ असते जेव्हा स्वतःच आयुष्य संपवावं लागतं. लव यु ऑल गुडबाय फॉरएव्हर. या मेसेजमुळे आणखी काही गोष्टी पुढे आल्या आहेत. दीक्षा मागील काही दिवसांपासून तणावाखाली होती असे तिच्या मित्रांमध्ये बोलले जात आहे. दिक्षाचा मोबाईल नेमका कुठे आहे ? याबाबत देखील उलगडा झालेला नाही. आता हि पोस्ट पोलिसांकडून तपासली जात आहे.









