साखरीनाटे येथे विजेच्या धक्क्यामुळे युवकाचा मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील साखरीनाटे येथे विज पडून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साखरी नाटे येथील मुबसम मलिक सोलकर (32) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो सौदी येथे शिपवर कामाला असल्याचे समजते. नुकताच तो परदेशातून तो गावी आला होता.

आज दुपारी तो आपल्या घराशेजारी छोट्या होडीत काम करत असताना लगत विज पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून मुबसम याचा उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

मुबसम याला दोन लहान मुली असून मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या आई-वडिलांचा तो मोठा मुलगा होता. त्याचे दोन लहान भाऊ शिक्षण घेत असल्याचे समजते. मुबसम याच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.