शीळ धरण ते जॅकवेल जलवाहिनीचे काम युध्दपातळीवर सुरु

रत्नागिरी:-रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतच्या जलवाहिनीचे रखडलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. एकूण 550 मीटरी ही जलवाहिनी असून आतापर्यंत 55 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. हे काम न. प. प्रशासनाकडून पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करत आहेत.

न.प. हद्दीत सध्या पाण्याची टंचाई सुरू आहे. शहरवासियांना शीळ धरणातील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे एकदिवस आड पाणीपुरवठा सुरु आहे. शीळ धरण ते पंपिंग हाऊसपर्यंत पाईपलाईन टाकण्यास झालेल्या विलंबाबाबत शहरवासियांकडून ओरड सुरू झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जलवाहिनी जोडण्याच्या कामी पाहणी शिवसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यानी शुक्रवारी केली. नळपाणी योजना पूर्ण झाली असताना पंपिंग हाऊसपर्यंत लाईन पूर्ण होणे आवश्यक आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावे यासाठी न.प. प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.

त्यासाठी शिवसेना शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, माजी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, सुदेश मयेकर, विकास पाटील, विजयन्खेडेकर, अभिजित दुड्ये आदींनी शीळ धरण येथे भेट दिली. तेथील संरक्षक भिंत, जलवाहिनीच्या कामी पाहणी केली. एकूण 550 मीटरी जलवाहिनेची काम शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुरू आहे. त्यासाठी नवीन पाईपलाईन देखील उपलब्ध झालेले आहेत. अजून 460 मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे. हे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसा पाण्यातील फ्लोटीग पंप वाहून जाउ नयेत यासाठी त्याला रोप लावून सुरक्षित करण्यात आलेले आहे. जेणेकरून पावसाळ्यापूर्वी शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.