एलटीटी-थिवी उन्हाळी स्पेशल ५ जूनपर्यंत धावणार

रत्नागिरी:- उन्हाळी सुट्टी हंगामासाठी कोकण मार्गावर २० एप्रिलपासून दर शनिवारी चालवण्यात येणारी एलटीटी-थिवी उन्हाळी स्पेशल ५ जूनपर्यंत धावणार आहे. याशिवाय आठवड्यातून एकदा धावणारी स्पेशल आता १३ मे ते ५ जून याकालावधीत तीन दिवस धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

उन्हाळी सुट्टीसह लग्नसराईसाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात डेरेदाखल होत आहेत. याचमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल गाड्यांना विक्रमी गर्दी उसळत आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा, यादी १०० ते ३०० च्या आसपास गेली आहे. यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळणे अशक्य झाले असून जनरल डब्यातून प्रवास करण्याची नामुष्की ओढवत आहे. उन्हाळी स्पेशल गाड्यांची संख्या अत्यल्प असल्याने गर्दीचे विभाजन देखील अशक्य झाले आहे. याचमुळे ०११२९/०११३० क्रमांकाची एलटीटी- धिविम आठवड्यातून दर शनिवारी धावत होती.

सोमवारपासून स्पेशल सोमवार, बुधवार, शनिवार व परतीच्या प्रवासात मंगळवार, गुरूवार, रविवार धावणार असल्याने गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. ही स्पेशल एलटीटीहून रात्री १०.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता थिविम येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी ४.३५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता एलटीटीला पोहचेल.

या स्पेशलला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकात थांबे आहेत. आठवड्यातील तीन दिवस धावणाऱ्या स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. बऱ्याच वेळा स्पेशल रेक उपलब्ध न झाल्याने विलंबाने सुटत असली तरी प्रवाशांची स्पेशलला मिळणारी पसंती कायम आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नातही तितकीच भर पडत आहे.