वीज बिलाची होणार बचत; नाट्यगृहाच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प 

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेने स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या वीजबिलावर होणारा खर्च आता कमी होणार आहे. यासाठी नाट्यगृहाच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय रनप प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 

अलीकडेच १० कोटी रुपये खर्च करून नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आता ६७ लाख रुपये खर्च करून नाट्यगृहावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया झाली असून, लवकरच वर्कऑर्डर दिली जाणार आहे. यामधून ७५ किलोवॉट वीजनिर्मिती होणार असल्याने नाट्यगृहाचा वीजबिलाचा ५० टक्के खर्च कमी होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे जिल्हा नियोजनमधून हा निधी उपलब्ध करून दिला आहे.

स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी पालिकेच्या मालकीचे असून ते २००६-२००७ ला सुरू झाले. कोकणातील सर्वांत मोठे नाट्यगृह असले तरी अनेक सुविधांचा अभाव असल्याने कलाकारांसह आयोजक, प्रेक्षकांना याचा त्रास होत होता. या ठिकाणची वातानुकूलिन यंत्रणा डिझेलवर चालत होती. साऊंड सिस्टीम प्रभावी नव्हती. या त्रुटींबाबत नाट्यकर्मींना पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर अल्पावधीत नाट्यगृह अद्ययावत करण्यात आले. आता वातानुकूलिन यंत्रणा विजेवर चालते.नाट्यगृहातील इतर उपकरणेसुद्धा विजेवर चालणारी आणि दर्जेदार आहेत. यामुळे दरमहा ७० हजाराच्या वर वीजबिल येते. आता हा खर्च वाचवण्यासाठी नाट्यगृहाच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.