जिल्ह्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना दिली जंतनाशक गोळी

रत्नागिरी:- मातीतून प्रसार होणारा कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने मंगळवार 13 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ रत्नागिरीतून करण्यात येउन यादिवशी जिल्हास्तरावर सुमारे ग्रामीण भागातील व शहरी भागातील 1 ते 19 वर्ष वयोगटातील एकूण 3 लाख 7 हजार 510 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळीचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम शासकीय व खाजगी शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यांत यावी व सर्व स्तरावर मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यांत यावे अश्या सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा यंत्रणेने नियोजन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. ए. आठल्ये यांनी यांच्याहस्ते रत्नागिरी शहरातील नगर परिषदेच्या लक्ष्मीचौक येथील लोकमान्य टिळक विद्यालय येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला.
राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताचा आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 मध्ये सुरु करण्यात आला. राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम फेब्रुवारी व ऑगस्ट महिन्यात शाळा आणि अंगणवाडीमध्ये एकाच निश्चित दिवशी जंतनाशक गोळया देऊन राबविण्यात येतो. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या मोहिमेचा उद्देश 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची आरोग्य विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक), महिला बाल कल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागांमार्पत अंमलबजावणी करण्यात आली. ही मोहिम जिल्हयातील सर्व आरोग्य संस्था, अंगणवाडया, शाळा, कॉलेजेस मध्ये आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत राबविण्यात आली.