मान्सून आगमनापर्यंत शहरातील पाणी पुरवठा दर सोमवारी राहणार बंद

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी तसेच पाण्याची बचत करण्यासाठी मान्सून आगमनापर्यंत दर सोमवारी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
रत्नागिरी शहरात साडे दहा हजार नळपाणी जोडण्या असून शहरासाठी दररोज १८ ते १९ दक्षलक्षघनमीटर पाणी पुरवठा होतो. शहराला शीळ व पानवळ धरणातून पाणी पुरवठा होत असला तरी दोन्ही धरणातील पाणीसाठी बाष्पीभवनामुळे घटू लागला आहे. शीळ धरणातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. दर सोमवारी नळपाणी योजनेच्या वाहिन्यांची तसेच पाणी पुरवठा व्यवस्थेच्या अन्य देशभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवल्यामुळे पाण्याचीही बचत होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.