समुपदेशनाने १४१ कुटुंबातील वाद संपुष्टात

महिला मदत कक्ष स्थापन; पती-पत्नी वाद, आर्थिक व्यवहाराचे बरेच अर्ज

रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलाच्यावतीने महिला सुरक्षा विशेष कक्ष व पोलिस ठाणे स्तरावरील महिला मदत कक्षातर्फे पती-पत्नीमधील वाद, विविध कुटुंबांमधील वाद व कौटुंबिक कलह यामध्ये २०२३ ला १९२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील योग्य पद्धतीने समुपदेश करून १४१ जोडप्यामधील कलह, वाद, यशस्वीरित्या मिटविण्यात आले.

महिला सुरक्षा विशेष कक्षातील तक्रारींमध्ये पती-पत्नीचे कौटुंबिक वाद, मोबाईलचा अतिप्रमाणात वापर, एकमेकांना वेळ न देणे, एकत्र कुटुंबात न राहणे, घरातील आर्थिक व्यवहार आदी कलहाची कारणे निदर्शनास आली. या प्राप्त तक्रारींमध्ये महिला दक्षता समिती व भरोसा सेलमधील सदस्यांच्या मदतीने अर्जदारांमध्ये योग्य पद्धतीने समुपदेशन करून १४१ जोडप्यांमधील कलह, वाद संपुष्टात आणण्यात आले. तसेच इतर तक्रारी या अर्ज दिल्यानंतर कौटुंबिक स्तरावरच मिटल्या आहेत. पती-पत्नीमधील वाद, तसेच महिलांचा सासरी होणाऱ्या छळाबाबतच्या तक्रारी सामंजस्याने सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर महिला सुरक्षा विशेष कक्ष व पोलिस ठाणे स्तरावर महिला मदत कक्ष स्थापन आहेत.

कौटुंबिक वाद टोकापर्यंत जाऊन घटस्फोटांच्या घटनांमध्ये वाढ होऊ नये, त्यांच्या मुलांच्या भवितव्यावर परिणाम होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे किंवा पोलिस ठाण्यामधील महिला मदत कक्षाची मदत घ्यावी व समुपदेशनसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.