रत्नागिरीत 24 फेब्रुवारीला ऐतिहासिक सहभोजन, सहभजन कार्यक्रम

दानशूर भागोजीशेठ कीर पुण्यतिथीनिमित्ताने भरगच्च कार्यक्रम

रत्नागिरी:- दानशूर श्रीमान भागोजीशेठ किर यांच्या पुण्यतीथीनिमित्त अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ,रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आणि पतित पावन मंदिर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 24 फेब्रुवारी 2024 रोजी रॅली,सहभोजन,सहभजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये सकाळी 9.30 वा.श्री भैरी मंदिर खाालची आळी येथून भव्य रॅलीची सुरुवात करुन दुपारी 12 वा.पतितपावन मंदिर येथे रॅलीचे स्वागत करण्यात येणार आहे. यावर्षी 3 हजार नागरिक या कार्यक्रमांचा लाभ घेणार असल्याची माहिती भंडारी समाजाचे नेते राजीव किर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी भागोजीशेठ किर यांचे नातू अंकुर किर, नातसून प्रेमा किर आणि विविध जातीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी धार्मिक,संगीत,कवी, लेखक, बांधकाम व्यावसायिक या क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात येणार आहे.त्यासाठी सर्व समाजातील अशा व्यक्तींची माहिती 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ कार्यालय,भागिर्थी भुवन खालची आळी ,रत्नागिरी येथे आणून द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने श्रीमान भागोजीशेठ किर यांच्यासोबत काम केले आहे अशा व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देउन विशेष गौरव पुरस्कार देण्याचे आयोजिले आहे.

पतीतपावन मंदिराच्या 24 फेब्रुवारी 1931 रोजीच्या कलशारोहण कार्यक्रमावेळी स्वा.सावरकर आणि श्रीमान भागोजीशेठ किर यांच्या संकल्पनेतून सर्व समाजातील लोकांसाठी सहभोजन,सहभजन पार पडले होते.ते सहभोजन 24 फेब्रुवारी 1944 पर्यंत सुरु होते.परंतू भागोजीशेठ किर यांच्या निधनानंतर ते बंद झाले होते.त्यानंतर 79 वर्षानंतर गेल्याच वर्षी हे ऐतिहासिक सहभोजन व सहभजनाचे गेल्यावर्षी 24 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा आयोजन करण्यात आले होेते.स्वातंत्र्यपूर्व काळात सवर्ण-दलित भेदभाव मिटवण्यासाठी सावरकर यांच्या विनंतीवरुन श्रीमान भागोजीशेठ किर यांनी स्वखर्चाने उभारलेल्या पतितपावन मंदिराने देशामध्ये मोठी क्रांती केली होती.

भागोजीशेठ किर यांनी शाळा वसतीगृह, देवळे, धर्मशाळा, गोशाळा, अनाथाश्रम, बालकाश्रम, विहिरी, पाणवठे, स्मशानभूमी स्वखर्चातून बांधून लोकसेवेत अर्पण केले आणि संपूर्ण मानवजातीची सेवा केली.आज सवर्ण-दलित भेदभाव नसला तरी देशाच्या एकतेसाठी सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.त्यासाठी सर्व समाजाच्या बंधुभगिनींनी एकत्र येणे गरजेचे आहे.त्यासाठी सर्व समाजाच्या बंधुभगिनिंनी एकत्र येत अन्नदानाच्या आणि सहभोजनाच्या सत्कार्यामध्ये सहभागी व्हावे.तसेच भागोजीशेठ किर यांनी केलेल्या कार्याचा गौरव भजनाच्या माध्यमातून करण्यासाठी सहभजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजीव किर यांनी दिली.