२६ जानेवारीला ३५० किल्ल्यांवर फडकणार तिरंग्यासह भगवा ध्वज

रत्नागिरी:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात हे वर्ष शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानेही’ हे वर्ष साजरे करण्यासाठी नाविण्यपूर्ण असा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील दुर्गप्रेमी शिवप्रेमी २६ जानेवारी रोजी ३५० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा व तिरंगा ध्वज फडकवणार आहेत.

एकाच दिवशी ३५० किल्ल्यांवर ध्वज फडकवण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. त्यांनी निवडून दिलेल्या संस्थांमार्फत निवडून दिलेल्या किल्ल्यांवर ध्वजारोहण होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमी व शिवप्रेमींना आवाहन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत पाच हजाराहून अधिक शिवप्रेमींनी नाव नोंदणी केली आहे. या नावांचा आढावा घेऊन संस्थाना अखिल महाराष्ट्र महासंघाच्या प्रमुख संघामार्फत सर्व समन्वयकांपर्यंत भगवा ध्वज, तिरंगा ध्वज व शिवप्रतिमा पोहोचवण्यात आली आहे. रत्नागिरीतील रत्नदुर्ग माउंटेनिअर्स या संस्थेमार्फत रत्नगिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भगवती मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर असणार आहेत. तरी या कार्यक्रमाकरिता रत्नागिरीतील सर्व शिवप्रेमींनी व दुर्गप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नदुर्ग माउंटेनिअर्स संस्थेचे अध्यक्ष मा. श्री वीरेंद्र वणजू, सेक्रेटरी गौतम बाष्टे यांनी केले आहे.