महावितरणची जिल्ह्यात 26 कोटींची थकबाकी

रत्नागिरी:- महावितरणचे सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात 1 लक्ष ग्राहकांकडे 26 कोटी 93 लक्ष रुपये वीज बिल थकबाकी आहे. त्यात घरगुती 79 हजार 477 ग्राहकांकडे 8 कोटी 89 लक्ष, वाणिज्यिक 9709 ग्राहकांकडे 3 कोटी 72 लक्ष, औद्योगिक 930 ग्राहकांकडे 1 कोटी 47 लक्ष, पथदिवे 1505चे 9 कोटी 46 लक्ष,सार्वजनिक पाणीपुरवठा 1114 योजनांचे 1 कोटी 64 लक्ष वीज बिल थकबाकी आहे.

रत्नागिरी येथे महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांची नुकतीच आढावा बैठक झाली. या बैठकीस मुख्य अभियंता विजय भटकर, अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई, कार्यकारी अभियंता  रामलिंग बेले, कैलास लवेकर, विशाल शिवतारे यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंता उपस्थित होते.

सध्या रत्नागिरी विभागात 14 हजार 778 (थकबाकी 5 कोटी 65 लक्ष) तर चिपळूण विभागात 8043 ग्राहक (थकबाकी 3 कोटी 36 लक्ष) व खेड विभागात 9339 ग्राहकांचा (थकबाकी 3 कोटी 14 लक्ष) वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी वीज बिल थकलेल्या सर्व ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करा, असे आदेश डांगे यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत पाणीपुरवठा व पथदिवे ग्राहकांचा वीजपुरवठा एप्रिल 2021 नंतरच्या थकीत व चालू वीजबिल वसुलीसाठी खंडित करा, असेही त्यांनी निर्देशित केले आहे.  ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण सदैव प्रयत्नशील आहे. वीज ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात महावितरण यंत्रणा सातत्याने व्यस्त असते. ग्राहकांना वीज पुरविण्यासाठी स्वतः एक ग्राहक म्हणून महावितरणला महानिर्मितीसह इतर सरकारी व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करावी लागते. तेंव्हा ग्राहकांकडून वीज बिलांच्या स्वरूपात जमा होणार्‍या पैशांतून वीज खरेदी व दैनंदिन प्रशासकीय खर्च भागवावे लागतात. ग्राहकांनी नियमित वीज बिल भरणा नाही केल्यास हा खर्च भागविणे कठीण होते. तेव्हा ग्राहकांनी नियमित वीज बिल नाही भरल्यास वीज पुरवठा खंडितची कारवाई करा, असे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.