रत्नसिंधु योजनेसाठी दिडशे कोटीची तरतूद: खा. राऊत 

रत्न कृषी महोत्सव, पशुपक्षी प्रदर्शनाचे उदघाटन

रत्नागिरी:-शेतकरी, मच्छीमार, बागायतदार, बचत गट सदस्य यांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या रत्नसिंधु योजनेसाठी दिडशे कोटीची तरतूद केली आहे. अजुन साडेतीनशे कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचा फायदा घेऊन प्रत्येक वाडीत एक तरी उपक्रम अमलात आणण्यासाठी रत्नागिरीवासीयांनी पुढाकार घ्यावा. तरच समृध्द विकास होईल असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.

जिल्हा नियोजन मंडळ, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी, जिल्हा परिषद पशुविभाग यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित रत्न कृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार राऊत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे, रोहन बने, राजेंद्र महाडिक, वेदा फडके, डॉ. धनंजय जगदाळे, श्री. मुळे आदी उपस्थित होते. या ठिकाणी 120 स्टॉल लावण्यात आले असून कोकणी खाद्यपदार्थ यांचे स्टॉल आहेत.

खासदार राऊत म्हणाले, अत्यंत थोड्या कालावधीत कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ शेतकर्‍यांनी घेतला पाहीजे. सिंधुरत्न काही योजनांमधून 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे. याचा फायदा घ्या आणि प्रत्येकाने गाव, वाडीत रत्नसिंधुची योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे. यासाठी वाडीतील लोकांनी एकत्र आले पाहीजे. या प्रदर्शनाचा घेतला पाहीजे. पंजाबहून आणलेला बकरा, चाळीस किलो वजनाचे कलिंगड हे महोत्सवाचे वैशिष्ट आहे. सध्या ऋतुचक्र बदलत असून माती परीक्षण ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कर्मचारी रत्नागिरीतील प्रयोगशाळेत उपलब्ध करुन दिला जाईल.

याप्रसंगी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍याला राज्य, देश नव्हे तर जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. नवीन सुधारित जातींच्या लागवडीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्याचे फळबाग लागवडीखाली क्षेत्र एक लाख 92 हजार हेक्टर असून त्यात वाढ करण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेत 90 टक्के अनुदान लागवडीसाठी मिळते तर दहा टक्के शेतकर्‍याला भरावे लागतात. मधुमक्षी पालनाला 50 लाख तरतूद केली आहे. शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी झिरो बजेट शेतीचे नियोजन केले पाहीजे. तसेच शेतकर्‍यांनी अझोलाचा वापर खत म्हणून केला तर उत्पादनात वाढ होऊ शकते.
शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. सेंद्रीय खतं रासायनिक खतांना उत्तम पर्याय आहेत. ती चांगल्या प्रकारे झाडांचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करतात. जीवामृताचा शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त वापर केला पाहीजे, असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले.
हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर उतरु शकत नसल्याने पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी महोत्सवाला शुभेच्छाही दिल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.