जिल्ह्यातील आंजर्ले, सोनगाव, गावखडीत निसर्ग पर्यटन

कांदळवन उपजिवीका निर्माण; स्थानिकांना रोजगार

रत्नागिरी:- कांदळवन उपजिवीका निर्माण योजनेंतर्गत निसर्ग पर्यटनाकरिता दापोली तालुक्यातील आंजर्ले, खेड तालुक्यातील सोनगाव, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी या गावांची निवड केली आहे. यामध्ये करण्यात मरीन वॉक, कांदळवन सफारी, क्रोकोडाईल सफारी, पक्षी निरिक्षण, तारे निरिक्षण आणि कयाक बोटींग या सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये स्थानिकांना रोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कांदळवन कक्षामार्फत कांदळवन उपजिवीका निर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये शोभिवंत मत्स्यपालन हा प्रकल्प रत्नागिरी जिल्हातील सहा गावांमध्ये करण्यात येणार आहे. नऊ युनिट सुरु करण्यात येणार असून प्रत्येक युनिटसाठी 4,11,500 रुपये निधी दिला जाणार आहे. कालवेपालन प्रकल्प 6 गावात सुरु केला असून प्रत्येक युनिटला 38,000 रुपये निधी दिला जाईल. पिंजर्‍यातील मत्स्यपालन हा प्रकल्प सहा गावांत सुरु करण्यात आला असून 9 युनिटना मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाकरिता 3,22,000 रुपये प्रति युनिट निधी दिला जाईल. खेकडापालन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील आठ गावांमध्ये होणार असून 5,60,000 रुपये पर युनिट दिले जातील. निसर्ग पर्यटनाकरिता आंजर्लेसाठी 4 लाख, सोनगावसाठी 12 लाख आणि गावखडीसाठी एक लाखाचा निधी वितरीत करण्यात आला आहे .