आरटीओ कार्यालयाकडून अन्यायकारक दंड वसुली

बसपाचा आक्रमक पवित्रा; कारवाईची मागणी

रत्नागिरी:- उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सर्वसामान्यांकडून अन्यायकारक दंड वसुली सुरु असून जयगड-निवळी मार्गावर सुरु असलेल्या अवजड वाहतुकीकडे या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याची गंभीर दखल घेऊन त्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव यांनी केली आहे.

हे निवेदन आरटीओच्या रत्नागिरीतील विभागिय कार्यालयात देण्यात आले. कोविड 19 च्या पार्श्‍वभुमीवर जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांनी केव्हा बाहेर पडावे याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याचे पालन नागरिकही तेवढ्याच जबाबदारीने करत आहेत; मात्र आरटीओ कार्यालयाकडून काही लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. 1 जुलैला साईनगर येथील आरटीओ कार्यालयाबाहेर एका व्यक्तीवर कारवाई अयोग्य होती. पिठाच्या गिरणीतून दळण घेऊन साईनगर येथे घरी परतणार्‍या दुचाकी चालकावर 2100 रुपयाचा दंड आकारला. त्याच्याकडे गाडीची सर्व कागदपत्रे आणि आवश्यक कारणही होते. तरीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली. संबंधित व्यक्ती मोलमजुरी करुन कुटूंब चालवणारी आहे. लॉकडाऊन काळात ते कामावर जाऊ शकत नाहीत. संबंधित व्यक्तीने आजुबाजूच्या लोकांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी ते भरले आहेत. अशा दयनीय परिस्थितीत जीवन जगणार्‍यांवर कारवाई करुन आरटीओ अधिकारी काय साधत आहेत असा प्रश्‍न निवेदनाद्वारे केली आहे. कारवाईसाठी लक्ष दिल्याच्या नादात अधिकारी वागत असून त्याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहेत. याची गंभीर दखल घेऊन आरटाईओ विभागाकडून संबंधित व्यक्तीला न्याय द्यावा असे निवेदनात नमुद केले आहे.

एकीकडे सामान्यांवर कारवाई होत असतानाच जयगड-निवळी मार्गावर सुरु असलेल्या अवजड वाहतुकीकडे आरटीओंचा कानाडोळा होत असल्याचे दुसरे निवेदन बसपातर्फे देण्यात आले आहे. अवजड वाहतुकीसाठी वेळ निश्‍चित करुन दिलेली होती; परंतु ते अधिकारी बेशिस्तपणे कशीही वाहतुक करत आहेत. अतिवेगाने अवजड वाहने हाकत असल्यामुळे त्याचे परिणाम अपघाताला होणार आहेत. चाफे येथील अपघातात एकाचा मृत्यू झालेला आहे. या वाहतुकीचा स्थानिक जनतेला त्रास होत आहे. याची गंभीर दखल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी घ्यावी अशी विनंती निवेदनात केली आहे.