कोरोना लक्षण नसलेल्यांची देखील होणार टेस्ट 

 

नवे आदेश; रुग्णालय प्रशासन मात्र अनभिज्ञ

रत्नागिरी:- राज्य शासनाने कोरोना संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे. तशा आदेश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाला तसे लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे अशा चाचणीबाबत जिल्ह्यात संभ्रम आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानं शासन आणि प्रशासनही हादरले आहे. नागरिकांमध्ये कोरोनाचा मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला. राज्यात आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे, अशा माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रिप्शन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

आरोग्य मंत्र्याच्या आदेशाबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याशी संपर्क साधला असता, असे लेखी आदेश आम्हाला अजून प्राप्त झालेले नाही. आज येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाईल. त्यासाठी आवश्यक टेस्टिंग कीट आमच्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र अजून आदेश न आल्याने काहीसा संभ्रम आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत 5 हजार 134 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 2 लाख 17 हजार 181 एवढी झाली आहे. तर 3 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 18 हजार 558 रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 89 हजार 313 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात मागील 24 तासांत 224 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 9 हजार 250 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.