मिऱ्या बंधारा दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाला तातडीने मान्यता द्या

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

रत्नागिरी:- मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधारा 6 ठिकाणी धोकादायक बनला आहे. या 6 ठिकाणांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. दुरुस्तीसाठी 98 लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले मात्र प्रशासकीय मान्यते अभावी दुरुस्तीचे काम रखडले आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून या अंदाजपत्रकाला तातडीने प्रशासकीय मंजुरी द्या, अशा सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. 

मिर्‍या बंधार्‍याची सात ठिकाणी झीज झाल्याने तेथील रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गावातील लोक जीव मुठीत धरून राहात आहेत. दुर्लक्ष झाल्यामुळेच चिपळूण येथील तिवरे धरण फुटुन निष्पाप लोकांचा जीव गमावावा लागला. अशी परिस्थिती येथे निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनानाने 98 लाखाच्या कामाला तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुशांत उर्फ मुन्ना चवंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.

या बंधार्‍याच्या दुरूस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी जानेवारी 2020 मध्ये पतन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले. या बंधार्‍यामुळे दुरूस्तीसाठी 98 लाख रुपयांची गरज असल्याचे पत्रानुसार दिसून आले. त्यानंतर मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली मात्र अद्यापही या कामाला प्रशासकीय मान्यात दिलेली नाही. त्यांनी प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र जोपर्यंत समिती बैठक होत नाही. तोपर्यंत प्रस्तावास मंजूरी देता येणार नसल्याचे जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी सांगितले, असे पतन विभागाने दिलेल्या पत्रानुसार स्पष्ट झाले. बंधार्‍याची झीज गावासाठी धोकादायक ठरत आहे. गावातील लोक स्वतःचा जीव मुठीत धरून राहात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी ही बाब विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या सामोर मांडली. ना. दरेकर यांनी केलेल्या सूचनेनुसार चवंडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची प्रत ना. दरेकर यांच्याकडे पाठवली. 

 या निवेदनावर तातडीने निर्णय घेताना मिऱ्या बंधारा दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची सूचना ना दरेकर यांनी केली आहे. दुरूस्ती न केल्यास मिऱ्या येथील ग्रामस्थांचे जीवन धोक्यात येवू शकते. निवेदनात मांडलेली स्थिती अगदी तंतोतंत खरी असून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी मिऱ्या बंदर बंधाऱ्याची दुरूस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. या कामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी आपल्याकडे पाठविण्यात आले असून अद्याप मान्यता मिळालेली नाही. तरी परिस्थितीचे गांभीर्य पाहून या बंधाऱ्याच्या 98 लाखाच्या अंदाजपत्रकास तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी सूचना ना. दरेकर यांनी प्रशासनाला केली आहे.