शाळा बंद….गुरुजींकडून लॉकडाऊनचा सदुपयोग

शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शाळाही बंद झाल्या हीच संधी साधत  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरटच्या शिक्षकांनी स्वतः रंगाचा ब्रश हातात घेतला आणि अबोल भिंती सजवल्या.     

सृजनशील व उपक्रमाशील शिक्षक शाळेत आले की शाळेचा चेहरामोहरा कसा बदलतो याच नितांत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदची पाथरठ शाळेने दाखवले आहे. लॉकडाउनच्या काळात गावातील तरुणांना सोबत घेत स्वतः शाळेच्या संरक्षक भिंतीवर रंगकाम करण्याचे काम मुख्याध्यापक श्री रामचंद्र परचंडे यांनी केले. याचबरोबर शाळेचे प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीवर शिक्षणाची माहिती देणारे फलक तयार केले.मुले कार्टूनकडे आकर्षित होतात हे लक्षात घेऊन कार्टूनच्या चित्रातून शैक्षणिक संदेश देण्यारे फलक तयार केले. या पेटिंगमधून जिल्हा परिषदेच्या शाळा कशा दर्जेदार आहेत याची मांडणी केली आहे संरक्षक भिंती वरील पेंटिंग मुळे शाळेच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.     

इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे. या शाळेत बदलीने आलेले शिक्षक रामचंद्र माधवराव परचंडे आणि केशव सूर्यभान घोरोवाडे यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश सावंत, समिती सदस्य,पालक व ग्रामस्थ यांच्या मदतीने शाळेत विविध उपक्रम राबविले आहेत. सेमी इंग्रजी शाळा, विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस, शालेय बचत बँक व जिल्हास्तरीय अनेक उपक्रमात सहभाग घेऊन शाळेत नवचैतन्य आणण्याचे काम केले. मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांना हाताशी धरून आपली शाळा सुंदर व सुसज्ज बनविण्याचा निर्धार केला. ग्रामस्थांना आर्थिक मदत करणे शक्य नसले तरी श्रमदानासाठी नेहमी तत्पर असतात. शाळेचे बागकाम, छप्पर दुरुस्ती, नळ-पाणी दुरुस्ती यासारखी कामे पालकांनी श्रमदानातून केली आहे.     

शाळेची इमारत जुनी असल्याने रंग काम करून त्याची शोभा वाढवावी यासाठी गावातील तरुणांना सोबत घेऊन शिक्षकांनी शाळेचे रंगकाम केले. अशा शिक्षकांच्या मेहनतीमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आज दर्जेदार आणि गुणात्मक  होत आहेत.  या कामात उत्तम सहकार्य लाभले ते त्यांचे शाळा सहकारी केशव घोरोवाडे यांचे, याचबरोबर शाळा कापडगाव 1 चे शिक्षक चांडसुरे व वेळवंड नं 3 चे शिक्षक श्री क्षीरसागर यांचेही उत्तम सहकार्य लाभले.