मिऱ्यावर फसलेले जहाज चार दिवसात हलवाच 

बंदर विभागाचे जहाज मालकाला आदेश 

रत्नागिरी:- मिर्‍या येथे अडकलेले बसरा स्टार जहाज किनार्‍यावर रुतले आहे. त्यामुळे बंधार्‍यावर आपटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जहाजामधील धोकादायक असलेले ऑईल आणि 25 हजार लिटर डिझेल काढण्यात एजन्सीला यश आले आहे. मात्र किनार्‍या सुरक्षिततेच्यादृष्टीने येत्या चार दिवसामध्ये जहाज काढा, स्क्रॅप करा, पण काहीतरी निर्णय द्या, असा अल्टीमेटम प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी जहाज एजन्सीला दिला आहे. 

 मिऱ्यावर फसलेल्या जहाजाच्या मुक्कामाला आज महिना झाला. जहाज वाचविण्याच्यादृष्टीने जोरदार मोहीम सुरू झाली आहे. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन) मंचलवार यांनी जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी यांना घेऊन जहाजावरील जळके ऑइल काढण्याची मोहित हाती घेतली. ऑईल गळती होऊन किनार्‍याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ते टाळण्यासाठी प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला नोटिस बजावली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑइल काढण्यास सुरवात झाली. पंप बसवून पाइपद्वारे किनार्‍यावर मोठे बॅरल ठेवून त्यामध्ये हे ऑइल काढण्यात आले. 30 ते 35 बॅरल म्हणजे सुमारे साडेसहा ते सात हजार लिटर ऑइल काढण्यात आले. त्यानंतर लगोलग जहाजामधील सुमारे 25 हजार लिटर डिझेलसाठा सुरक्षित काढण्यात आला आहे. किनारा सुरक्षेच्यादृष्टीने बंदर विभागाने एजन्सीला चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. चार दिवसामध्ये हजार काढा किंवा स्क्रॅप करा, अशी स्पष्ट सुचना दिली आहे.