पुढील काही तासात रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता 

रत्नागिरी:- गुजरात आणि लगतच्या परिसरातील हवामान बदलासह अरबी समुद्रातील हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. 3 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्याला आणि 4 जुलै रोजी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४८ तासामध्ये पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, पण जुलै महिन्यात कोकण आणि महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असंही कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे.