आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; बळींची संख्या 21 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 21 वर  पोचली आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 484 आहे. आज 4 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 353 झाली आहे.
 

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये शिरगाव ता. रत्नागिरी येथील पुरुष रुग्णाला (वय 65) किडनी व मधुमेहाचा आजार होता तसेच काडवली संगमेश्वर येथील महिला रुग्ण (वय 42) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

आज कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 2 रुग्णांना तर जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 2 रुग्ण असे एकूण 4 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 106 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या 1 रुग्णाचा समावेश आहे.