होम क्वारंटाईन आराखड्याचा सत्कोंडी पॅटर्न

पन्हळी, कांबळे लावगणही ; लोकसहभाग महत्वाचा

रत्नागिरी:- कोरोनाबाधित म्हटल्यावर नाक मुरडणारे आणि त्यांना सोसायटी किंवा गावात न घेणारे अनेक प्रकार घडले. मात्र तालुक्यातील सत्कोंडी, पन्हळी, कांबळे लावगण या ग्रामपंचायतींनी कोरोना संशयित आणि बाधितांची काळजी घेऊन वेगळा आदर्श ठेवला आहे. ग्रामस्थांनी संशयितांची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन करताना भविष्यात येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन तयार केलेला होम क्वारंटाईनचा आराखडा संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आला.  

ग्रामपंचायतींनी सर्व गावात रोग प्रतिकार शक्तीवर्धक आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप केले. अनेक सेवाभावी संस्थांमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. लॉकडाऊन व क्वारंटाईन काळात घरपोच किराणा वस्तू आणून दिल्या तर रास्त धान्य दुकानातून मिळणारे रेशन एकत्रित घरपोच दिले. गावामध्ये निर्जंतुकीकरण केले. सर्व ग्रामस्थांना सॅनिटायझर वाटप केले. गावातील प्रत्येक व्यक्तीला मास्कचे वाटप केले. कोरोनाबाबत जनजागृती केली. जिल्ह्याबाहेरून व राज्याबाहेरून (मुंबई, पुणे, बंगळूर, गोवा, हैदराबाद) आलेल्या ग्रामस्थांची संस्थात्मक क्वारंटाईन व होम क्वारंटाईनची काटेकोर व्यवस्था केली. बाहेरून आलेल्यांची माहिती अद्ययावत ठेवली. ग्राम कृतिदल, तिन्ही गावांचे गावकर व वाडी कृतिदल, ग्रामस्थ व चाकरमानी समन्वय समिती, महिला बचत गटदेखील अतिशय चांगले योगदान देत आहे.

गावात कार्यरत असलेली महाराष्ट्र रत्न पुरस्कारप्राप्त व नेहरू युवा केंद्र भारत सरकारशी संलग्न असलेल्या स्वयंसेवी संस्था अ‍ॅक्टिव्ह फ्रेन्ड्स सर्कलचे आपत्ती व्यवस्थापनासाठी नोंदणी केलेले सभासद यांनीही भरीव योगदान दिले. सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भोये यांनीदेखील कामाचे कौतुक केले असून बीट अंमलदार साळवी व मनवल यांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये सरपंच प्रणाली मालप, अरुण मोर्ये, संजय बैकर, ग्रामसेवक जाधव, महेश महाकाळ व बलेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका, विनायक किंजळे उपसरपंच सतीश थुळ यांचा समावेश आहे.