सोमवारपासून एसटी वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता

रत्नागिरी:- लॉकडाऊनमुळे तब्बल 80 दिवस ठप्प असलेली एसटीची सेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली. जिल्हाभरात 159 फेऱ्यांचे नियोजन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले होते मात्र पहिल्याच दिवशी एसटीला प्रवाशांचा थंडा प्रतिसाद मिळाला. सोमवारपासून नियमित सेवा देण्याचा विचार एसटी प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या तीन टप्प्यामध्ये प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र चौथ्या टप्यात एसटी, रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आली. 22 मेपासून तालुका व जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू करण्यात आली. विभागातून 52 फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले होते. प्रवाशाचा अल्पप्रतिसाद असला तरी एसटी सेवा सुरू आहे, हे समजण्यासाठी ही वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. महामंडळाने जिल्ह्यातंर्गत ग्रामीण भागातील फेर्‍या सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली एसटी आता गावागावातून धावू लागल्याने प्रवाशांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

22 मे पासून तालुका ते तालुका बसफेर्‍यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र 20 दिवसानंतर ग्रामीण भागातील अंतर्गत फेर्‍यांनाही परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील नऊ आगारातून 159 फेर्‍या आज दिवसभरात सोडण्यात आल्या. लॉकडाऊनपूर्वी दररोज 5 हजार 65 फेर्‍या सोडण्यात येत होत्या. दोन महिन्याच्या अवधीनंतर बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी ग्रामीण भागातील गाड्या सोडण्यात येत आहेत. गर्दीचा अंदाज घेत टप्याटप्याने फेर्‍या वाढविल्या जाणार आहेत.  सर्व गाड्यांचे निजंर्तुकीकरण केले जाणार आहे. सोशल डिस्टिन्सिंग राखत चालक, वाहक केवळ 22 प्रवाशांनाच घेवून प्रवास करणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्याला अल्पप्रतिसाद मिळाला.