शिक्षक परिषदेतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे अन्नत्याग आंदोलन

रत्नागिरी:- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित ज्वलंत समस्या त्वरीत निकाली काढाव्यात यासाठी राज्य शिक्षक परिषदेतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी अन्नत्याग आंदोलन केले.

शिक्षक बाधंवाच्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन त्यांनी केले. त्यामध्ये अनुदानास पात्र घोषित अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यावरील शिक्षक कर्मचार्‍याना 1 एप्रिल 2019 पासुन 20 टक्के वेतन अनुदान अशंतः अनुदानित, 20 टक्के वाढीव वेतन अनुदान देण्यासंदर्भातील अध्यादेश निर्गमित करावा अशी मागणी केली. तुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव त्वरीत निकाली काढुन अनुदानास पात्र घोषित करणे वेतन अनुदान वितरीत करणे,  अंपग शिक्षण योजना माध्यमिकस्तर अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारकांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा करणे, या शिक्षकांचे अन्यत्र समायोजन करणे, आठ हजार संगणक शिक्षक, निर्देशक यांना पुर्ववत सेवेत रुजु करुन घ्यावे, रात्र शाळेस पुर्णवेळ शाळांचा दर्जा देणे,  टीईटी ग्रस्त  शिक्षकांचे जाने 2020 पासून रोखलेले वेतन न्यायालयाच्या अधीन राहुन अदा करणे या मागण्या करण्यात आल्या आहेत.