रत्नागिरीत विनामास्क फिरणाऱ्या 66 जणांना दंड

रत्नागिरी:- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. रनप प्रशासनाने या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करत शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना थेट पाचशे रुपयांचा दंड केला आहे. आतापर्यंत 66 जणांवर कारवाई करण्यात आली असून 33 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

राज्यासह जिल्ह्यात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढत असून जिल्ह्यात आतापर्यंत दहाजणांचे बळी गेले आहेत. या आजाराला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.  

जिल्ह्यात फिरताना मास्क वापरणे आवश्यक आहे. रनप प्रशासनाने या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. मास्क घालूनच नागरिक बाहेर पडत आहेत का नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी असलेल्या या पथकाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली. आता पर्यंत 66 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. विनामास्क असलेल्या प्रत्येकाकडून 500 रुपये दंड करण्यात आला आहे. आता पर्यंत 33 हजार दंडरुपी रक्कम वसूल करण्यात आली आहे.