२० दिवसात ६८ हजार ७५९ कामगारांची घर वापसी

रत्नागिरी :- लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक करून महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८ ७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे . या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेनच्या माध्यमातून १५६७७ कामगार आणि कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचवण्याचे काम कोकण रेल्वेने केले आहे.   

लॉकडाऊन सुरु  झाल्यानंतर विविध भागात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. अचानक आलेल्या या संकटाच्या काळात कोकण रेल्वेने मालगाडींची वहातुक सुरु ठेवत महाराष्ट्र ,कर्नाटक ,गोवा राज्यात जीवनावश्यक वस्तूंची वहातुक करत निर्माण होणारी टंचाई टाळण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. या नंतर पावसाळ्याच्या तोंडावर आवश्यक असणाऱ्या खताचा पुरवठाहि या तिन्ही राज्यांच्या विविध भागांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला. आणि आता गेल्या वीस दिवसापासून कोकण रेल्वे कामगार आणि त्यांच्या अडकलेल्या कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम नियोजनबद्ध रीतीने करते आहे.       

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात लॉक डाऊन पासून विविध राज्याचे हजारो कामगार आपल्या राज्यात परतण्यासाठी इच्छूक होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेश ,बिहार, कर्नाटक,झारखंड ,मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील श्रमिकांकरिता खास ट्रेन सोडण्यात आल्या. महाराष्ट्रातून सोडण्यात आलेल्या या १३ श्रमिक स्पेशल ट्रेन मधून १५६७७ श्रमिक आणि त्याचे कुटुंबीय रवाना झाले. रत्नागिरी सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेशला तीन ट्रेन मधून ४०१६,बिहारला दोन ट्रेन च्या  माध्यमातून २६४३ ,कर्नाटक मध्ये तीन ट्रेन च्या माध्यमातून ३६८० ,झारखंड येथे तीन ट्रेन च्या माध्यमातून ३५०१,मध्यप्रदेश ला एक ट्रेन च्या माध्यमातून ११६४ तर राजस्थान ला एक ट्रेन च्या माध्यमातून ६७३ कामगार रवाना  झाले.       

गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातूनही कोकणरेल्वेच्या माध्यमातून  श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबियांना देशाच्या विविध भागात पोहोचवण्यात आले . गोव्यातून ३६ ट्रेन च्या माध्यमातून ५०५१८ श्रमिक त्यांच्यात्यांच्या घरी पोहोचले . तर कर्नाटक मधून दोन ट्रेन च्या माध्यमातून २५६४ कामगार आणि कुटुंबियांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. कोकणरेल्वेच्या मार्गावर श्रमिकांची हि वाहतूक अजूनही सुरु आहे.  पुढील काही दिवसात मागणीनुसार श्रमिकांना त्यांच्या घरी त्यांच्या राज्यात पोहोचवण्यकरिता कोकण रेल्वे ट्रेनची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. गेल्या वीस दिवसात या हजारो कामगारांच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे पोहोचवण्याकरिता कोकण रेल्वेच्या अधिकारी वर्गापासून कामगार वर्गापर्यंत सगळ्यानी अहोरात्र मेहनत घेतली. रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि महसूल पोलीस आणि एसटी विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हजारो कामगार त्यांच्या सामानासह जाताना करण्यात आलेल्या अचूक  नियोजनामुळे कोणत्याही गोंधळाशिवाय हि संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात कोकण रेल्वेला यश आलं.