लॉकडाऊन काळात वाहतूक शाखेकडून 1 कोटी दंड वसुली

रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या काळात पोलिसांनी 28 हजार 599 वाहन चालकांकडून  तब्बल 1 कोटींचा दंड वसूल केला आहे. पण, यामध्ये विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे तो हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून. अशा तब्बल 13 हजार 154 बाईकस्वारांकडून 65 लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात विनाकारण गाड्या घेऊन नियम मोडून फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करत या वाहनचालकांना एक चांगली शिस्त लावली आहे. विशेष म्हणजे या कारवाईमुळे जिल्ह्यात हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या कमालीची वाढली आहे. जवळपास 95 टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईमुळे हेल्मेट सक्ती यशस्वी झाल्याचं चित्र आहे. तसेच नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून विक्रमी दंडही वसूल करण्यात आला आहे.

विनाकारण बाहेर फिरू नका, असं आवाहन लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अगदी सुरुवातीपासून पोलिसांकडून करण्यात येत होतं. मात्र तरी सुद्धा बाईक किंवा फोर व्हिलर चालक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडताना दिसत होते. पण, नियमांवर बोट ठेवत ट्राफिक पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. हेल्मेट नसणे, सीट बेल्ट न घालणे, किंवा विरूद्ध दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. 

लॉकडाऊनच्या या दोन महिन्यांच्या काळात पोलिसांनी 28 हजार 599 वाहन चालकांकडून  तब्बल 1 कोटींचा दंड वसूल केला आहे. पण, यामध्ये विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे तो हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून. आशा तब्बल 13 हजार 154 बाईकस्वारांकडून 65 लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शहर असेल किंवा इतर भागात असेल मोठ्या प्रमाणावर वाहन चालक कारवाईच्या भीतीने नियमांचे पालन करत आहेत. शिवाय हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. जवळपास 95 टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरू लागले आहे, अशी माहिती जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे.