विहीरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागाला यश

रत्नागिरी:-देवरुख- रत्नागिरी मार्गावरील माळवशी येथे विहीरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागाला यश आलं आहे. बिबट्याची सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

देवरुख- रत्नागिरी  मार्गावरील हॉटेल हिल पॉईंट येथे सोमवारी संदीप चाळके यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे संध्याकाळी साडेसहाच्या निदर्शनास आले. याची खबर संतोष जाधव आणि परिमल चाळके यांनी वन विभागाला दिली. यानंतर वनविभागाचे अधिकारी आर. सी. भवर , परिक्षेत्रवन अधिकारी प्रियंका लगड यांच्या नेतृत्वाखाली देवरुखचे वनपाल सुरेश उपरे , वनरक्षक सागर गोसावी , एन एस गावडे , शर्वरी कदम, संतोष कदम, दिलीप गुरव घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला बाहेर काढण्यात आलं. सदरचा बिबट्या मादी जातीचा असून तो एक वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं..