कोरोनाविरोधात राज्य सरकारला जागं करण्यासाठी भाजपाचं ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

रत्नागिरी जिल्ह्यातही भाजपकडून निवेदन

रत्नागिरी :- राज्यातील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे असा आरोप करत राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भाजपाने आजपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी आज (मंगळवार) राज्यभर प्रशासनाला निवेदने देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातही भाजपकडून निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटलं आहे की, सर्व देशाबरोबर महाराष्ट्र सुद्धा Covid – 19 च्या विरोधामध्ये संघर्ष करत आहे . परंतु संपूर्ण देशामध्ये Covid – 19 चे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्यूदर याच्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र क्रमांक 1 वर पोहोचलेला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राज्य सरकारच्या नेतृत्वाचं या सर्व गोष्टींकडे होत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष याचमुळे आज महाराष्ट्राची, महाराष्ट्रातल्या जनतेची अशाप्रकारची दयनीय अवस्था झालेली आहे. राज्यामध्ये प्रशासन नावाचं काही चीज अस्तित्वात आहे अशा प्रकारची भावना आता लोकांमध्ये उरलेली नाही. किंबहुना राज्य करणारे जे सत्ताधारी आहेत यांचं अस्तित्वच याठिकाणी जाणवत नाही आणि अशा प्रचंड मोठ्या संकटाच्या वेळेला राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं आहे, अशा प्रकारची लोकांमध्ये स्वभाविक भावना निर्माण झालेली आहे. Covid – 19 विरोधात केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन्स आखून दिल्या, त्या संदर्भात ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांचा पुढचं पाऊल उचलण्यामध्ये राज्य सरकार संपूर्णतः अपयशी ठरलं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

तसेच राज्याच्या मंत्र्यांमध्ये व प्रशासनामध्ये कोणताही समन्वय नाही असे चित्र वारंवार समोर येत आहे . रत्नागिरी मध्ये कोरोना पेशंट संख्या वाढत आहे मात्र अद्यापही स्वॅब टेस्टिंग लॅब बाबत निर्णय होत नाही . आरोग्य सुविधांची उभारणी पर्याप्त न करता मोठ्या संख्येने अन्य शहरातून नागरिकांना मनमानी पास देऊन रत्नागिरीत प्रवेश देण्यात आला . मात्र आरोग्य सुविधांची वानवा व प्रशासनाचे निर्णयात नसलेल्या एकवाक्यतेमुळे गोंधळाचे उद्विग्नतेचे वातावरण आहे त्यात प्रशासनाची हतबलता मध्यंतरी व्यक्त झाली त्यामुळे ही प्रचंड गोंधळ निर्माण झाला . बाजारपेठा सुरु झाल्या पण बाजारपेठांना रोज सेनेटायझेशनची आवश्यकता असतांनाही ते करण्याबाबत प्रशासन निर्देश देत नाही . या सर्व गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नागरिक तीव्र निषेध करतो आणि Covid – 19 विषयात तातडीने पावलं उचलून याला अटकाव करावा व महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांकरीता आर्थिक पॅकेज घोषित करावे , अशी मागणी सुद्धा आम्ही या निमित्ताने करत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.