संकटावर मात करत कोकणच्या राजाची परदेशवारी

रत्नागिरी :- यंदा हंगामाच्या सुरवातीला कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा निर्यातीला एक महिना उशिर झाला. एप्रिल महिन्यात 4,118 मेट्रीक टन आंबा निर्यात करता आला. गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केच निर्यात झाली. त्यानंतर 1 ते 10 मे या दहा दिवसात 2,235 मेट्रीक टन आंबा निर्यात झाली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश निर्यांतदारांनी मिळवले.
या वर्षी जपान, दक्षिण कोरीया, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरीका आदि देशांना आंबा निर्यात हवाई वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने सुरू झालेली नाही. तथापि मध्य-पुर्वेतील देश, जर्मनी, हाँगकाँग, इटली, नेदरलँन्ड, सिंगापूर, स्वित्झर्लंड, इंग्लंड या देशांमध्ये आंब्याची निर्यात सुरू आहे. मुंबई येथून हवाई सेवा उपलब्ध झाल्यास निर्यात विविध देशांना वाढू शकते असा अंदाज आहे. गतवर्षी 1 एप्रिल ते 10 मे 2019 या कालावधीत 14 हजार 727 मेट्रीक टन आंबा निर्यात झाला होता. 1 एप्रिल ते 10 मे 2020 या कालावधीत आंबा निर्यात 6 हजार 353 मेट्रीक टन आंबा निर्यात झाला. कोरोनामुळे काही देशांमध्ये अद्यापही वाहतूक व्यवस्था सुरळीत नाही. तसेच कोरोनाच्या भितीमुळे ग्राहकांवर मर्यादा आहेत. त्याचा परिणाम आंब्याच्या विक्रीवर होत आहे. त्यातून मार्ग काढण्यात पणन मंडळाला यश आले आहे. निर्यातीला चालना मिळाल्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंबा बागायतदारांना बाजारात चांगला दर मिळाला. अक्षय तृतीयेला दरवर्षी आंब्याचे दर घसरतात. यंदा अडीच हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. तो बागायतदारांच्या पथ्थ्यावर पडला. अजुनही निर्यात सुरूच असून कर्नाटकी आंबा दाखल झाल्यामुळे आंब्याचा दर स्थानिक बाजारात कमी होण्याची शक्यता आहे.