रत्नागिरी नगरपरिषदेने चालू आर्थिक वर्षासाठी पाणीपट्टी माफ करावी: अॅड. पटवर्धन

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेला शहरपाणी योजनेसाठी आवश्यक निधी तीन वर्षापूर्वी प्राप्त झाले असून आजपर्यंत ही पाणी योजना सत्ताधाऱ्याना पूर्ण करून कार्यान्वित करता न आल्याने शहरातील नागरीकांना एकदिवस आड तेही कमी दाबाने अपूरे पाणी प्राप्त होत आहे. केवळ ८ दिवसांचे काम बाकी आहे अशी बतावणी केली जात होती. मात्र अद्याप काम सुरु करण्यात नगरपालिकेला यश आलेले नाही. हे नगरपरिषदेचे अपयश असल्याने चालू आर्थिक वर्षातील पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी केली.

नगरपरिषदेकडे धोरण नसल्याने मे महिन्यातही पाण्याची विवंचना कायम राहणार. नगरप्रशासन चालवणाऱ्यांची नकारात्मक कार्यपद्धती इच्छा शक्तीचा अभाव यामुळे कोट्यावधींचा निधी गेली ३ वर्ष पडून आहे आणि योजना ही पूर्ण नाही परिणामी नागरिक पाण्यासाठी त्रस्त असून टँकरवर अमाप खर्च करावा लागत आहे. हा भुर्दंड नगरपालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांवर पडत आहे. नगरपरिषदेने प्राप्त निधी ७% प्रमाणे ३ वर्षाचे व्याज म्हटले तरी १३ कोटींच्या पुढे व्याज प्राप्त केले आहे. व्याज मिळवण्यासाठी हा निधी पाडून ठेवून व्याज कमावणे ही प्रकृती अयोग्य आहे. नगरपरिषदेने चालू आर्थिक वर्षाची पाणीपट्टी माफ करावी. कोरोनामुळे ठप्प झालेले अर्थविश्व त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेले नागरिक याचा विचार करून पाणीपट्टी माफ करावी तसेच निधी प्राप्त होऊन प्रदीर्घ काळ होऊनही पाणी योजना कार्यान्वित य झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. टँकरसाठी खर्च करावा लागत आहे. हा भुर्दंड पडत असल्याने चालू आर्थिक वर्षातील पाणीपट्टी माफ करावी त्यासाठी आवश्यक तर राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे मत अॅड. दीपक पटवर्धन यांनी शेवटी व्यक्त केले.