एमआयडीसीतर्फे चार गुरुवारी पाणी कपात

रत्नागिरी :- पावसाचे आगमन अनिश्‍चित असल्यामुळे चार गुरुवारी विविध भागात पाणी कपात करण्याचा निर्णय एमआयडीसीतर्फे घेण्यात आला आहे. महामंडळामार्फत रत्नागिरी पालिकेच्या काही भागासह बारा ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो.
सद्यःस्थितीमध्ये काजळी नदीतील पाणी साठा अतिशय कमी झाल्यामुळे पुरेशा दाबाने नियमित पाणी पुरवठा करणे अशक्य होते आहे. तसेच पावसाचे आगमन अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाणी साठ्याचे काटेकोरपणे नियोजन करुन पाऊस चालू होईपर्यंत पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने सध्या महामंडळाने पाणी पुरवठा कालावधीमध्ये कपात करण्याचे धोरण ठरविले असून 14 मे 2020 पासून प्रत्येक गुरुवारी पाणी कपात करण्याचे ठरविले आहे. 14 मे 2020, 21 मे 2020, 28 मे 2020 व  4 जुन 2020 रोजी पाणी पूर्णपणे बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी असे एमआयडीसीतर्फे सांगण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पाऊस लांबणीवर पडल्यास आणखी कपात करावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने ग्रामस्थांनी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी विभाग यांनी केले आहे. महामंडळामार्फत रत्नागिरी मिरजोळे व झाडगांव औद्योगिक क्षेत्र, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग व नजीकच्या मिरजोळे, शिरगाव, मिर्‍या, नाचणे, कुवारबाव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खाजगी ग्राहकांना पाणी पुरवठा करण्यात येतो.