आंबा उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ द्यावी: बाळ माने

रत्नागिरी :-  यावर्षी कोरोनाचा आणि उत्पादन कमी असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ द्यावी आणि त्यावरील व्याज हे केंद्र सरकारने भरावे, अशी विनंती आंबा उत्पादक शेतकरी तथा माजी आमदार बाळ माने यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आता थेट केंद्र सरकारला साकडे घातले आहे. यावर्षी आंबा हंगाम उशिरा सुरू झाला, त्यात उत्पादनही अवघे तीस टक्के आहे. सध्या आंब्याचा दर हा स्थिर आहे. मात्र यंदा उत्पादन कमी असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी ३० जून २०२० ऐवजी ३० जून २०२१ अशी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बाळ माने यांनी केली आहे. कोकणातील महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे आंबा व्यवसाय. या व्यवसायाच्या माध्यमातून तिन्ही जिल्ह्यात जवळपास २ हजार कोटींची उलाढाल वर्षाकाठी होत असते. तसेच जवळपास १२०० कोटी रुपयांचे कर्ज आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर आहे. मात्र, यावर्षी अवघे ३० टक्के उत्पादन झाले आहे. त्यात आंबा हंगाम उशिरा सुरू झाला. कोरोनाचेही सुरुवातीला ग्रहण लागले. मात्र सध्या दर स्थिर आहेत, तरीही उत्पादन कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे.कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी पुन्हा स्वतःच्या पायावर उभा रहावा आणि तो कर्जाच्या खाईत जाऊ नये यासाठी सरकारने आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी माने यांनी केली. तसेच खत, आणि किटकनाशके केंद्र सरकारने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोफत पुरवावीत, अशी मागणी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती माजी आमदार तथा आंबा उत्पादक शेतकरी बाळ माने यांनी दिली.