बोलेरो पिकअप-ट्रकच्या धडकेत एकजण ठार

रत्नागिरी:- मुंबई- गोवा महामार्गावरील हातखंबा येथील साहिल शांती पेट्रोल पंपाशेजारी बोलेरो पिकअप गाडीने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जाऊन ट्रकला धडक देत अपघात केला. ही घटना रविवारी रात्री ११ . ३० वा. सुमारास घडली. या अपघातात पिकअप गाडीचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमिर एकनाथ मडव (रा. नाचणे, रत्नागिरी) मृत्यू झालेल्या पिकअप गाडी चालकाचे नाव आहे. रविवारी रात्री तो आपल्या ताब्यातील पिकअप गाडी (एमएच ०७- एजे- ०३२६) घेऊन रत्नागिरीत येत होता. त्याच सुमारास एक ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. ही दोन्ही वाहने हातखंबा येथील पेट्रोलपंपाजवळ आली असता अमिरचा आपल्या गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द बाजुला जाऊन ट्रकला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता कि त्यात बोलेरो पिकअप गाडीचा पूर्ण चराडा झाला होता. यात गंभीर जखमी झाल्याने अमिरचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस करत आहेत .