मंदीतही शोधली ‘त्यांनी’ संधी

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मिळवले 1 कोटीचे उत्पन्न

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात बरेच उद्योग व्यवसाय बंद असल्याने रोजगार उपलब्ध नाहीत, आर्थिक उलाढाल मंदावली आहे. अशा परिस्थितीतही रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण जीवनोन्नती अभियानाशी संबंधित गटाच्या महिलांनी मंदीतही संधी शोधली आहे. बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योग करून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी ही माहिती दिली.

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय आणि उद्योग ठप्प झाले असले तरी गावागावांमधील महिला बचत गटांनी मास्क तयार करणे, भाजीपाला आणि कोंबड्यांची विक्री करून चांगले उत्पन्न मिळवले. जिल्ह्यातील अडीच हजार महिलांनी घरबसल्या रोजगार मिळवला. त्यातून एक कोटी सहा लाखांची उलाढाल झाली.खर्च वगळता उर्वरित उत्पन्न त्यांच्या हाती राहिले आहे. जिल्ह्याती ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत असलेल्या उमेद महिला बचत गटांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींना आवश्यक मास्क तयार करून त्याचा पुरवठा त्यांनी केला. त्यातून जिल्ह्यातील २६५ समूहांमधील टेलरिंग व्यवसायाशी निगडीत ३४६ सदस्यांना रोजगार मिळाला. दोन लाख ३१ हजार २७० मास्कची विक्री झाली. त्यातून ३७ लाख ९३ हजार ३६० रुपये मिळाले. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या मतदारसंघात नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना वाटण्यासाठी ७५ हजार मास्क खरेदी केले. इतर जिल्ह्यांमधून मास्क आणण्यापेक्षा या स्थानिक बचत गटांकडून ते बनवून घेणे सोपे झाले. त्यामुळे मास्क मुबलक प्रमाणात आणि लवकर उपलब्ध झाले. काही शासकीय ऑर्डरही मिळाल्याचे श्री. माने यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे गावागावात भाजीची टंचाई होती. काही महिला बचत गटांनी गावातच स्टॉल उभे करून भाजी उपलब्ध करून दिली. जिल्ह्यातील ७२७ समूहांमधील एक हजार १३७ सदस्य भाजीपाला व्यवसायाशी निगडित आहेत. त्यांनी या काळात ७१ हजार ७४२ टन भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून दिला. त्यातून १९ लाख ८८ हजार ३४४ रुपयांची कमाई झाली, असे श्री. माने म्हणाले.

कुक्कुटपालन व्यवसायही बचत गटांच्या पथ्यावर पडला. लॉकडाऊनमध्ये त्यांनी ४८ लाखाची कोंबड्यांची विक्री केली. जिल्ह्यातील ७२ ग्राम संघांना जोखीम प्रवणता कमी करण्याच्या योजनेतून ५४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. त्याचा लाभ अपंग, वृद्ध, विधवा, परित्यक्ता, अनुसूचित जातीजमाती, दुर्धर आजारांनी पीडित व्यक्तींना मिळाला. गटांचे बचतीचे आणि कर्ज हप्ते घरोघरी जाऊन जमा करून बँकेत भरणे, पैशांची गरज असलेल्या कुटुंबांना पैसे उपलब्ध करून देणे अशी कामे उपजीविका सखी आणि उद्योग सखी यांनी लॉकडाऊनच्या काळात केली. ग्रामीण भागात तयार केलेले मास्क तालुका कार्यालयामध्ये पोहोचविण्याचे कामही त्यांनी केले.