जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी, चाफेरी ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी

275 कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

रत्नागिरी :- लॉकडाऊनच्या कालावधीत जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी आणि चाफेरी ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या संकटकाळात चाफेरी गावातील तब्बल 275 कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. अडचणीच्या काळात जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी आणि चाफेरी ग्रामपंचायतीने केलेल्या मदतीने अनेक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. उद्योग व्यवसाय बंद असल्याचा फटका ग्रामीण भागातील हातावर पोट असलेल्या कुटुंबांना बसला आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ लॉकडाऊन असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले आहेत. अशावेळी जयगड पंचक्रोशीतील चाफेरी गावातील ग्रामस्थांसाठी जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी आणि चाफेरी ग्रामपंचायतिने दिलासादायक कामगिरी केली आहे.लॉकडाऊनच्या काळात चाफेरी गावातील तब्बल 275 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी आणि चाफेरी ग्रामपंचायतीकडून करण्यात आला. यामध्ये 10 किलो तांदूळ, 2 किलो साखर, 1 किलो तूरडाळ, तेल पिशवी आदी साहित्य 275 कुटुंबना देण्यात आले. या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीचे सुधीर तेलंग, सुदेश मोरे, योगिता महाकाळ, जेएसडब्ल्यू एनर्जीचे जाधव, चाफेरी सरपंच महेश चौगुले, उद्योजक नंदू केदारी, विनोद चौगुले, वामनकाका पालकर, रणजित चौगुले, जितू चौगुले आदी उपस्थित होते.