बाजार समितीमध्ये आंबा खरेदी-विक्री 23 पासून

 

रत्नागिरी :- आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आंबा खरेदी-विक्री सुुरु करण्यात येणार आहे. तशा सुचना जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी दिल्या आहेत. पणनच्या मदतीने 23 एप्रिलपासून दुपारी 3 वाजल्यानंतर बाजार समितीच्या आवारात याची सुरुवात होणार आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे पार्श्वभूमीवर सध्या 3  मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकर्‍यांना त्यांचा उत्पादित आंबा खुल्या बाजारात विक्री करणे अवघड झाले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. या बाबीचा विचार करुन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन कायद्यान्वये जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांचा आंबा खरेदी- विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात तरतूद आहे. याचा विचार करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कृषी पणन मंडळ आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांची संयुक्त सभा 20 एप्रिलला झाली.

आंबा हे राष्ट्रीय फळ असून कोकणातील आंब्याला जीआय मानांकन प्राप्त आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी या सभेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. अशोक गार्डी यांनी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांना त्यांचा उत्पादित आंबा बाजार समितीच्या आवारात घेऊन येण्याबाबत आवाहन केले आहे. आंबा घेऊन येताना त्याची प्रत गुणवत्ता चांगली असावी म्हणजेच फळाचे वजन 180 ग्रॅम पेक्षा जास्त असावे व डाग विरहित असावा. आंबा खरेदी-विक्री 23 एप्रिलपासून दररोज दुपारी 3  वाजल्यानंतर बाजार समितीच्या आवारात होणार आहे. आंबा बागायतदारांनी अधिक माहितीसाठी am_ratnagiri@msamb.com  या ई-मेल वर अथवा किरण महाजन 9422636830, संजय आयरे 7387606565 यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा उपनिंबधक डॉ. गार्डी यांनी आवाहन केले आहे.