वाहतूक, शाळा, मॉल, व्यायामशाळा, धार्मिक स्थळ बंदच

इतर काही उद्योग व्यवसायांना तत्वतः मान्यता

रत्नागिरी :- 20 एप्रिल पासून संचारबंदी मोठ्या प्रमाणावर शिथिल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रवासी वाहतूक यामध्ये बस आणि खासगी वाहतूक, रिक्षा वाहतूक यांना बंदी तर धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. बंद ठेवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये विमान, रेल्वे, बस आणि खाजगी बस वाहतूक, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, टॅक्सी, रिक्षा, मॉल, जिम्नॅशियम, व्यायामशाळा, सर्व प्रकारची धार्मिक स्थळे यांचा समावेश आहे.

तर आरोग्य सुविधा, दवाखाने, केमिस्ट, फार्मसी, मेडिकल लॅब, पशूवैद्यकीय सेवा, पशू लसीकरण, औषधी वाहतूक, बायो-मेडीकल वेस्ट निचरा, पशूवैद्यकीय व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना फिरण्याची परवानगी असेल. तसेच कृषि अंतर्गत शिथिल बाबीमध्ये कृषि उत्पादन व वाहतूक, आंबा, काजू, नारळ- सुपारी लागवड, झाडावरून खाली उतरवणे व वाहतूक यांना परवानगी असेल. कृषी औजारे, बियाणे, औषधे, किटकनाशके, खतांची दुकाने, कृषि उत्पादन वितरण आणि त्याची विक्री सुरु राहील.मत्स्यव्यवसाय विभागामध्ये मत्स्यव्यवसाय व त्यासंबधीचे कोल्ड स्टोअरेज, वाहतूक, पॅकेजिंग आणि विक्री, माशाची डोक्यावर पाटीतून होणारी विक्री सुरु करण्यात येईल.

मनरेगा अंतर्गत फळबाग कामे सुरु होतील. मनरेगा अंतर्गत इतर प्रस्तावित कामे करता येतील.दुग्ध व्यवसाय व इतर  दुध उत्पादन, संकलन आणि विक्री सुरु राहील. दुध संकलन केंद्र सुरु राहतील. दुधाची वाहतूक देखील सुरु राहील.पोल्ट्री, पशुखाद्य त्याचा कच्चामाल सुरु राहील. खाजगी व इतर सर्व गौशाळा. गौण वनउपजांतर्गत वनवणवे रोखण्यासाठी मंजूर लाकूडफाटा विक्री (शासकीय व खाजगी )सुरु ठेवणारआर्थिक क्षेत्रातील सर्व बँका व वित्तीय संस्था सुरु राहतील. सर्व विमा कंपन्या सुरु राहतील. सर्व सहकारी बँक आणि पतसंस्था सुरु राहतील. सामाजिक न्याय  विभागाच्या  लाभ योजनांचा 32000 लाभार्थ्यांना थेट लाभ पोस्टाद्वारे घरपोच दिला जाणार.

सामाजिक घटकामध्ये बाल निरिक्षण गृहे, आसरा केंद्रे, वृध्दश्रम यांचे कामकाज सुरु राहील. अंगणवाडी कर्मचारी लाभार्थी मुलांच्या कुटुंबास 15 दिवसात एकदा शिधा पोहचवतील याची खबरदारी घेतली जाईल.बांधकाम स्तरातील रस्ते पूल आणि पाटबंधारे प्रकल्प बांधकाम सुरु होणार. पुर्वी मंजूर व सुरु असलेली बांधकामे सुरु होणार. लोखंड, वाळू, विटा आणि इतर बांधकाम साहित्य वाहतूक सुरु होणार. संबधीत यंत्रणा कामगारांना ओळखपत्रे देतील. खाजगी बिल्डर्सची चालू बांधकामे सुरु करता येतील मात्र त्यांच्या कडे काम करणारे कामगार स्थानिक असावेत त्यांची निवास भोजन व्यवस्था बिल्डरची जबाबदारी असेल याची नोंद घेऊनच तहसीलदार परवानगी देतील.वाहतूक क्षेत्रातील सर्व प्रकारच्या मालवाहतूकीस परवानगी. वाहनात केवळ 2 चालक, 1 क्लिनर असणे गरजेचे. महामार्गावरील गॅरेज सुरु ठेवता येतील. केवळ मालवाहतूकदार व्यक्तींना भोजन देण्याच्या अटीवर तहसीलदार ढाब्यांना परवानगी देतील. रिकाम्या ट्रकच्या परतीच्या वाहतूकीस परवानगी आहे. मान्सूनपूर्व सर्व आवश्यक कामे सुरु राहतील. नगरपालिकांनी शहरांमधील खोदलेले रस्ते व खड्डे बुजवून घ्यायचे आहेत. पूर संरक्षण भिंत उभारणी कामे करता येतील. ज्या ठिकाणी टँकरची मागणी आहे तेथील व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे टँकर सुरु करण्याचे अधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांना असतील.उद्योग क्षेत्रातील उद्योगांमध्ये ग्रामीण भागातील लघू व मध्यम उद्योग सुरु करता येतील. इतर उद्योगांनी कामगांराची वाहतूक कमी प्रमाणात करण्याच्या अटीवर  तसेच कारखाना परिसरातच कामगारांची व्यवस्था केली तर त्यांना उद्योग सुरु करण्याची परवानगी देता येईल.