रत्नागिरीकरांना दिलासा; आणखी आठ अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी :- मिरज येथे 15 एप्रिल रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांबाबत अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेले सर्व आठ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनासह रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या सहवासात आलेल्यांना जिल्हा रुग्णालयात आणून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

जिल्हा रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करीत आहेत. जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या रुग्णांचे स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मिरज येथे पाठवले जात आहेत. मिरज येथून तपासणी अहवाल दोन दिवसात जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त होत आहे. नुकतेच आठ अहवाल मिरज येथून प्राप्त झाले असून या आठही जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.