मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाबाबत संयुक्त बैठकीनंतर निर्णय

रत्नागिरी :- कोकणाच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे .सद्यस्थितीत असलेल्या लॉक डाऊनमुळे महामार्गाचे काम बंद आहे,हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी मंगळवारी काम करणाऱ्या सर्व कंपनी प्रतिनिधी, अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना उदय सामंत , खासदार विनायक राऊत यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शुक्रवारी ना.सामंत, खा. विनायक राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा कोरोना बाबतचा आढावा घेतला त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याने उत्तम काम केले आहे हे काम यापुढेही असेच सुरू राहणे आवश्यक आहे असे सांगितले. रत्नागिरी जिल्हा ऑरेंज मधून ग्रीन झोन मध्ये कसा येईल यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत .

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई पुणे येथून आलेल्या एक लाख सहा हजार 314  पैकी 1883 जणांना होम कोरोन्टाईन करण्यात आले आहे. परदेशातुन आलेल्या अकराशे 27 पैकी 1026 जणांना 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर सद्यस्थितीत कोरोनाचे चार रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजिवडा येथील कोरोना रुग्णाचा अहवाल प्रलंबित आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सहायता निधीसाठी आतापर्यंत तब्बल एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. रत्नागिरीकरांनी दाखविलेल्या दातृत्व बद्दल ना.सामंत यांनी त्यांचे आभार मानले.तर 32 कोटी रुपयांचा डिझेल परतावा लवकरच मच्छीमारांना मिळेल असे ना .सामंत यांनी यावेळी जाहीर केले.