नगराध्यक्षांची जागरूकता; शहरातील 30 हजार कुटुंबांचा सर्व्हे

रत्नागिरी :- रत्नागिरी शहरात कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यानंतर नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी रत्नागिरी शहरातील 30 हजार कुटुंबांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती नगराध्यक्ष साळवी यांनी दिली.  रत्नागिरी शहरातील राजिवडा येथे कोरोनाचा रुग्ण सापडला आणि संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन राजिवड्यासह 3 किमीचा भाग सील केला. त्यानंतर पालिका प्रशासनाने आपली भूमिका चोख बजावत संपूर्ण शहरामध्ये निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली. आरोग्य विभागाकडून डास फवारणी करण्यात आली, साफसफाईवर भर दिली. पालिकेने सॅनिटायझर टनेल बनवला आहे. पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हा सॅनिटायझर टनेल बसविण्यात आला आहे. या टनेलमधून गेल्यावर सॅनिटायझरचा फवारा अंगावर उडतो आणि व्यक्ती निर्जंतूक होऊन आत जाते.  
 कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. शहरामध्ये सुमारे 20 ते 30 हजार कुटुंब आहेत. या सर्व कुटुबांचा सर्व्हे सुरू झाला आहे. पालिकेच्या शिक्षकांमार्फत हा सर्व्हे केला जात आहे. आतापर्यंत या सर्व्हेचे 90 टक्केच्या वर काम पूर्ण झाले आहे. यामध्ये कुटुंब प्रमुख, घरातील व्यक्तींची माहिती, लहान, थोरांची चौकशी, कोण आजारी आहे का, याची माहिती घेतली जात आहे. तसचे त्या कुटुंबप्रमुखाचे नाव आणि मोबाईल नंबर घेतला जात आहे.