दापोलीत होम क्वारेंटाइन व्यक्तीचा मृत्यू 

खबरदारी म्हणून या व्यक्तीचे दापोली प्रशासनाने घेतले स्वॅब 

रत्नागिरी:-दापोली तालुक्यातील एका 55 वर्षीय होम क्वारोंटाईन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुरोंडी तेलेश्वर नगर परिसरातील ही व्यक्ती आहे. क्वारेंटाइन व्यक्तीचा मृत्यू झाल्याने दापोली प्रशासनाची रात्रभर धावपळ उडाली. खबरदारी म्हणून या मृत व्यक्तीचे दापोली प्रशासनाने स्वाब घेऊन ते तपासणी पाठवले आहेत. तसेच या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येणाऱ्या दहा जणांनाही क्वारोंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान दापोलीच्या उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्यापूर्वीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृत्यू कशाने झाला हे नेमके कळू शकलेले नाही, मिरज येथून अहवाल आल्यावरच मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकणार आहे..

दापोलीतील ही व्यक्ती 22 मार्च रोजी घाटकोपर (मुंबई) येथून बुरोंडी येथे आपल्या घरी आली होती, मुंबई येथून आल्याने आरोग्य विभागाने त्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला होता, मुंबई येथून ते एकटेच आले होते, त्यांची पत्नी व दोन मुले घाटकोपर येथेच होती, काल रात्री 11 वाजणेचे सुमारास शौचास जाऊन आल्यावर ते घराच्या अंगणात आले, तेव्हा त्यांच्या छातीत दुखू लागले, उलटी झाली व तोंडातून फेसही येऊ लागले तेव्हा ते ओरडू लागल्यावर शेजारची मंडळी धावत आली व एका वाहनाने त्यांना दापोली  येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे तपासून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले.  उपजिल्हा रुग्णालयात नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते  मृत झाल्याचे सांगितले.

या व्यक्तीच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का असल्याने लगेचच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली, या व्यक्तीच्या मृत्यूमुळे काल रात्रभर शासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मृत व्यक्तीच्या स्वँब चा नमुना घेण्यात आला असून तो तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला आहे.

दरम्यान या व्यक्तीला घेऊन आलेल्या 10 गावकऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कृषी विद्यापीठाच्या शेतकरी निवास येथील क्वारंटाइन कक्षात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण मात्र अजून अस्पष्ट आहे..