जिल्ह्यात २५०० मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप.

रत्नागिरी:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे.जिल्ह्यात १ ते ५ एप्रिल या पाच दिवसात तब्बल १ लाख 7 हजार शिधापत्रिका धारकांना तब्बल २५००० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती रत्नागिरी चे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ११.५० लाख आहेत.या लाभार्थ्यांना ९४३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. अंत्योदय कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड १० किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड २५ किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.

बीपीएल व केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो तांदूळ दिला जातो.

जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे १०,००० क्विंटल गहू, १५,००० क्विंटल तांदूळ, तर १५६ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे २००० शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.