४० दुचाकी चालकांचा वाहतूक परवाना होणार रद्द

रत्नागिरी:- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हयात सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र त्यानंतरही किरकोळ कारणासाठी वाहने घेऊन रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आता कडक भूमिका घेत विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन येणाऱ्या 40 वाहनधारकांवर त्यांचे वाहन परवानेच निलंबित करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून तसा प्रस्ताव आता परिवहन विभागाला पाठवला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे.

तसेच संबंधित वाहन चालकांचे वाहतूक परवाने तीन महिन्यासाठी निलंबित करण्याचा करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी पाठवला आहे. तसेच 30 मार्चपासून पोलिसांनी विविध नाक्यांवर कारवाई केली असून 5 हजार वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास 25 लाख रुपयांचा दंड देखील वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे. दंडात्मक कारवाई करून देखील लोकं ऐकत नसल्याने आता वाहन परवाना रद्द करण्याची नामी शक्कल आता पोलिसांनी काढली आहे.