रत्नागिरीतील धान्य दुकानांसमोर सोशल डिस्टंसकडे दुर्लक्ष

रत्नागिरी:-जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोशलडिस्टंन्स पाळण्याची कळकळीची विनंती प्रशासन करीत आहे. मात्र आज शहरातील काही रास्त धान्य दुकानावर सोशलडिस्टंसची ऐशी की तैशी केल्याचे दिसून आले. अनेक दुकाना बाहेर मोठी गर्दी दिसून आली.
शासनाने 3 महिन्यांसाठी गरीब, दारिद्ˆयरेषेखालील आणि अंत्योदय योजनेतील कुटुंबांना लोकांना गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे. अवघ्या 2 रुपये किलो तांदूळ तर 3 रुपये किलो गहू दिला जात आहे. त्यामुळे रास्त धान्य दुकानावर महिला आणि पुरुषांनी प्रचंड गर्दी होत आहे. धान्यासाठी नागरिक कोरोनाच्या प्रादुर्भाव करणार्‍या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना सुमारे एक मिटरचे अंतर म्हणजे सोशलडिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे. मात्र शहरातील काही रास्त धान्य दुकानावर या नियमाची ऐशी-तैशी करून टाकली. लक्ष्मीचौकाजवळ असलेल्या एका रास्त धान्य दुकानाची पाहणी केली असता धान्य खरेदीसाठी लाभधारकांनी प्रचंड गर्दी केली होती. रांग रस्त्यापर्यंत आली होती. मात्र त्यामध्ये कुठेही सोशलडिस्टन्स नव्हता. एकमेकाला लागून सर्व उभे होते.