जि. प. पदाधिकारी देणार एक महिन्याचे मानधन

रत्नागिरी:-अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सर्व सभापती यांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणारे अधिकारी, कर्मचार्‍यांना जिल्हा परिषद सन्मानित करणार असल्याचे बने यांनी सांगितले. कोरोनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून ग्रामकृती दलाच्या माध्यमातून गावगावात नियोजनबद्ध काम सुरू आहे. ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्‍या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा अशा सुमारे चारजणांना जिल्हा परिषदेमार्फत अडीच लाखाचे विमा संरक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिली.
ग्रामपंचायतस्तरावरील चौदाव्या वित्त आयोजनातील निधीतून सॅनिटायझर व मेडिक्लोर खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आशा कार्यकर्ती, सर्व आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकार्‍यांना पाच हजार रुपये जिल्हा परिषद सेसअंतर्गत देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत क्षेत्रातील किराणा व माजी दुकानासमोर गर्दी होऊन संसर्ग होणार नाही. यासाठी दुकानांसमोर दीड मीटर अंतरावर चौकोन केले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामकृतीदल स्थापन केले आहेत. ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांना शासनाने कोरोना विषाणुचा प्रादर्भाव रोखण्यासाठी कोरोना या विषाणूच्या विरोधात लढा देणार्‍या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांमाठी न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत अडीच लाखाचा विमा उतरविला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे चार हजार कर्मचार्‍यांना मिळणार आहे. चौदाव्या वित्त आयोगातील मार्गदर्शक सूचनेनुसार विमा रकमेची तरतूद केली जाणार आहे.